आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे. या यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित रहावे अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
राज्यभरात १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भाजपाची महाजनादेश यात्रा निघणार आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच मतदारांना सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही देणार आहेत. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्यासाठी भाजप आता पासूनच तयारीत असल्याचे चित्र आहे.
तर, दुसरीकडे शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. १८ जुलैला जळगावातून या यात्रेला सुरूवात झाली आहे. आदित्य ठाकरे पाच टप्प्यात ही यात्रा करणार आहेत. या यात्रेचा प्रवास चार हजार किलोमीटर आहे.