रत्नागिरीचा रस्ता सत्ताधाऱ्यांनी घातला खड्यात

0

रत्नागिरी : ज्या रस्त्यावरून विकासाची पावले चालायची तोच रत्नागिरीचा रस्ता सत्ताधाऱ्यांनी खड्यात घातला आहे आणि त्याच्यापाठोपाठ विकासही हरवला आहे. रत्नागिरीच्या या विदारक परिस्थितीचा ‘आँखो देखा हाल’ जनतेच्या समोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष घेऊन येत आहे. सत्ताधारी शिवसेनेने खड्यात घातलेला विकास पाहण्यासाठी शहरातील खड्ड्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्टॉपपासून सुरू होणारे रत्नागिरी शहर मुख्य ८० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तारले आहे. याच मुख्य रस्त्यावरून शहराचा विकास आम्ही घेऊन येऊ अशा वल्गना करून अडीच वर्षांपूर्वी शिवसेना रत्नागिरी नगर परिषदेत सत्तेत आली. मात्र सत्तेत आल्यानंतर शहराचा विकास गायब झाला. नागरिकांच्या नळातून पाणी गायब झाले, दुभाजक आणि त्यावरची रोपे नव्याने उभी रहात असताना अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहिली. पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई न झाल्याने उतारावर असूनही शहरातील सखल भागात मुसळधार पावसात पाणी भरले. तर ज्या रस्त्यावरून शहराचा विकास धावणार होता तो मुख्य रस्त्यासह शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पसरले आणि त्यात विकास गायब झाला. शहराची वाताहात झाली आणि वाहनचालकांसह पादचारी, महिला, वृद्ध, रुग्ण कसरती करत शहरात वावरू लागले. विकासाचं हे फसवे व्हिजन मांडणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या विकासाचं हे रूप छायाचित्रांच्या रूपाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शहरवासीयांसमोर मांडणार आहे आणि शहरवासीयांच्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून देणार आहे. यासाठीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातर्फे गुरूवार दि. १५ ऑगस्ट रोजी शहरातील हॉटेल विवेकच्या मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अनोखे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पहावे आणि आपली रत्नागिरी कशी असायला हवी याबाबतची प्रतिक्रिया नोंदवावी, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, शहराध्यक्ष संकेत चवंडे आणि पदाधिकारी व कार्यकत्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here