भास्कर जाधव यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण

0

चिपळूण : गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याच्या चर्चेला गेल्या चार दिवसापासून उधाण आले होते. यावर आमदार जाधव यांनी स्वतः खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी आपली भेट झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट करत या चर्चेला पूर्ण विराम दिला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले असल्याचेही आमदार जाधव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याबाबत आता कुटुंब आणि कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही ते यावेळी म्हणाले. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे शक्यता आहे. आमदार भास्कर जाधव यांनी आज (ता.२८) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेस त्यांचे पुत्र समीर, विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. जाधव म्हणाले,  की उद्धव ठाकरे व आपली १५ वर्षानंतर  भेट झाली. त्याआधी पवारसाहेबांनी मंत्री केल्यावर स्व. शिवसेनाप्रमुख यांनी फोन करून अभिनंदन करत असाच मोठा हो असा आशीर्वाद दिला होता. मात्र. त्यांच्या नंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यावेळी २००४ च्या निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट करून त्याची कारणे काय, कशामुळे अन्याय झाला, त्याला कोण जबाबदार होते या विषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सेना प्रवेशाचे आमंत्रण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आता याविषयी कुटूंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू असे सांगितले. यामुळे आमदार जाधव याचा सेना प्रवेश निश्चित मानण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here