रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका जिल्ह्यातील पाऊण कोटीच्या १२३ कामांना बसला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामांचा अपवाद वगळता या कामांत आचारसंहितेचा व्यत्यय आला असून यामध्ये ५० टक्के कामे पाणी पुरवठा योजनची आहेत. तर अन्य कामांपैकी कृषी आणि मनरेगाच्या कामांनाही आचारसंहितेचा फटका बसला आहे. त्यापैकी ४५ चालू असलेल्या कामांवर अपुर्ण राहण्याची नामुष्की ओढवली आहे. आर्थिक वर्षाच्या मध्यावरच निवडणुका जाहिर झाल्यामुळे नियोजनाकडे कार्योत्तर मंजुरी मिळाल्या कामांना आता आचारसंहितेचा फटका बसला आहे. आचारसंहितेतून रस्ते दुरूस्ती आणि डागडुजीच्या कामांना वगळण्यात आल्याने या कामांचा अपवाद वगळता २४ नव्या रस्त्यांचे प्रस्ताव यामध्ये रखडलेले आहे. ४७ पाणी योजनांच्या कामांनाही आचारसंहितेचा फटका बसल्याने ही कामे ठप्प होणार आहेत. मनरेगा अतंर्गत सुरू असलेल्या ३२ कामांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. तर कृषी अंतर्गत करण्यात येणाऱ्या बांधबिधिस्तीच्या २० कामांचा निधी रखडल्याने या कामांनाही महिन्याभराचा फटका बसणार आहे.