रत्नागिरी : जनता खड्ड्याने बेजार झाली असताना दुसरीकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग एकाच रस्त्यावर दोनदा खर्च टाकण्यात गुंतलेले दिसत आहेत. देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागात हा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दीड कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा गोलमाल झाला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. ग्रामीण भागात तर रस्त्यांची दयनिय अवस्था बनली आहे. रत्नागिरीपांगरी मार्गे देवरूख हा रस्ता तर खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. दुरूस्तीसाठी व देखभालीसाठी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. या निधीत मात्र मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुरूस्ती व देखभाल कार्यक्रमांतर्गत बावनदी-तळेकांटे-तुळसणी-देवरूख या मार्गासाठी ५८ लाख ५७ हजार रुपये मंजूर झाले होते. त्याच रस्त्याला विशेष निधीमधून ४ कोटी रुपये मंजूर आहेत. देवरूख-कुंडी या मार्गासाठी ४० लाख तर विशेष निधीमधून २ कोटी २८ लाख रुपये मंजर झाले. त्याचबरोबर देवरूख-मातृमंदिर-काटवली मार्गासाठी २८ लाख तर विशेष निधीमधून ३ कोटी रुपये त्याचबरोबर पोचरी ते परचुरी २१ लाख ८३ हजार तर विशेषमधून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एकंदरीत एकाच रस्त्यावर दोन कार्यक्रमांतून निधी मंजूर करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असणार आहे. देखभाल व दुरूस्तीसाठी आलेला निधी न वापरता विशेषमधून आलेला निधीच वापरण्यात येत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे साधारण: दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त गोलमाल झाल्याची चर्चा सुरू आहे.