रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आयोजित ५२ वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव २०१९-२० अंतर्गत विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट, मुंबई येथे विविध गटातील वादविवाद स्पर्धा पार पडल्या. यात श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांचे मराठीसाठी ३५ आणि इंग्रजीसाठी ३१ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजचे मराठी आणि इंग्रजीसाठी संघ सहभागी झाले होते. इंग्रजीसाठी रफा मोडक आणि निहारिका साळवी यांचा संघ तर मराठी साठी तन्वी गद्रे आणि तेजश्री दाते यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील मराठी विभागाच्या स्पर्धेत तन्वी गद्रे आणि तेजश्री दाते यांनी उत्तम कामगिरी करीत त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या सोबत संघ मार्गदर्शिका म्हणून सहाय्यक प्राध्यापिका संयोगिता सासणे उपस्थित होत्या. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे आणि संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तृप्ती देवरूखकर यांनी अभिनंदन केले आहे.