मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी ते मातोश्री निवासस्थानावरून रवाना झाले आहेत. पदयात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत ते अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. यावेळी शिवसैनिकांची तसेच दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे. अर्ज भरण्यासाठी जाण्याआधी आदित्य यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन केले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या सोमवारी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे ठरलेले नाही, असे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलेले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र शिवसेनेचे हे सूर्ययान २१ ऑक्टोबरनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल, असा दावा केला आहे. आजपर्यंत शिवसेनेने सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केले, आता याच समाजकारणासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आदित्य यांनी केली, तेव्हा उपस्थित शिवसैनिकांनी त्यांना मोठाच प्रतिसाद दिला होता.