रत्नागिरी : गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारतचा संदेश घेऊन मुंबईतील वाशी येथे मरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. या मरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीतून सहभागी झालेले महेश गुंदेचा आणि तुषार खानविलकर यांनी दहा किलोमीटरचे अंतर पार करीत चमकदार कामगिरी केली. ‘स्वच्छ भारत’चा संदेश घेऊन रन फार इंडिया या मरेथॉन स्पर्धेचे आयोजन मुंबईतील वाशी येथील पाम बीच येथे करण्यात आले होते. दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटर या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतून उद्योजक महेश गुंदेचा आणि तुषार खानविलकर हे दोघे दहा किलोमीटर गटात उतरले होते. बुधवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता या स्पर्धेची सुरूवात झाली. दहा किलोमीटरच्या गटात उतरलेल्या रत्नागिरीतील महेश गुंदेचा यांनी हे अंतर एक तास व ३ मिनिटांत पूर्ण केले. तर तुषार खानविलकर यांनी एक तास आणि १० मिनिटांत अंतर पूर्ण केले. दोघांनाही प्रशस्तिपत्रक आणि पदक देऊन गौरवण्यात आले.