शृंगारतळी : महाराष्ट्रातील सर्व एस.टी. कामगारांना शासकीय मान्यता मिळण्याबाबत गेली अनेक वर्षे संघर्ष करून व आश्वासने मिळूनही शासनाने त्यावर निर्णय न घेतल्याने राज्यातील सर्व आगारातील एस.टी. प्रवाशांनी येत्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाचे कर्मचारी निमशासकीय कर्मचारी म्हणून गणले जातात, त्यामुळे त्यांना शासनाकडून पूर्ण पगार मिळत नाही. तसेच त्यासाठी तत्सम कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी मोर्चे काढून, आंदोलने करून आपल्या मागण्यावसमस्या राज्य सरकारकडे मांडल्या, तसेच विरोधी पक्षांकडेही कर्मचाऱ्यांनी ही समस्या मांडली होती. मात्र तरीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा संघटनेचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे आता कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांच्याकडेही कर्मचाऱ्यांनी मागण्यांचा पाठपुरावा केला होता. तसेच दोनवेळा जाहीर मोर्चा काढून ही मागणी रेटून धरण्याचा प्रयत्न झाला. शांततेच्या मार्गाने कर्मचारी ही मागणी करत होते. मात्र, आता नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांपुढे पर्याय उरला नसल्याने येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. राज्यभरातील सर्व आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा ग्रुप बनवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व तसीलदार यांना मतदानावरील बहिष्काराचा निर्णय कळविण्यात आला आहे.