कणकवली – चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली आहे. या संदर्भातील त्यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे. दरम्यान ठाकरे यांच्या टिकेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपची काय प्रतिक्रिया आहे याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे. सिंधुदुर्गातील टिकेचा रत्नागिरीत निश्चितच पडसाद उमटणार आहेत. दरम्यान काल ठाकरे यांनी सेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. भाजपच्या नितेश राणे यांच्या विरोधात सेनेने येथे उमेदवार दिला आहे. यामुळे सध्या कोकणात राणे – ठाकरे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका करू नका असा सल्ला माजी खासदार नारायण राणेंना दिला होता. तो पाळत राणेंनी संयम पाळला. पण ठाकरे यांनी केलेले टिकेमुळे कोकणातील भाजप शिवेसेनेतील वाद उफाळून आला आहे. रत्नागिरीत शिवसेना सर्वच्या सर्व पाच जागा लढवत आहे तर सिंधुदुर्गात तीन जागा लढवत आहे. दरम्यान, राणेंवर झालेल्या टिकेचा चिपळूण भाजपमधील कार्यकर्ते जाहीर निषेध करणार आहेत. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी कालच भाजपवर टिका करु नका असा इशारा दिला होता. पण सिंधुदुर्गात तो पाळला गेला नाही. याचा परिणाम रत्नागिरीत जाणवू लागला आहे. संगमेश्वर भाजपच्या प्रतिक्रियेबाबतही आता उत्सुकता लागून राहीली आहे.