सिंधुदुर्ग | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आमच्या पक्षात आल्यास सुधारतील असं सांगितलं. त्यावर विश्वास ठेवूया, असं गृहराज्यमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राजन तेली यांनी पूर्वी नारायण राणेंसोबत मिळून काम केलं आहे. त्यामुळे माझ्या विरोधात राणे यांनीच तेलीला पाठवलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. माझा राणेंशी व्यक्तीगत वाद नाही. त्यांच्या विचारधारेशी माझा लढा आहे, असंही केसरकर म्हणाले. तेली हे सहा महिने सावंतवाडी कारागृहात होते. कारागृहातून आलेला व्यक्ती समाजसुधारक म्हणून येत नसतो. त्यांच्या प्रचारासाठी राणे येतात. यातून जनतेने योग्य तो बोध घ्यावा, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दरम्यान, भाजप व राणे गटाच्या मदतीने राजन तेली आणि राष्ट्रवादीकडून बबन साळगावकर केसरकरांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहे. केसरकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 41 हजार 192 मताधिक्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम असल्याचं मानलं जातंय.