रत्नागिरी : ‘क्यार’ वादळामुळे मच्छीमारी व्यवसायासह त्यावर आधारित उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील साडेतीन हजारांहून अधिक मच्छीमारी नौका वादळाच्या भीतीने बंदरात स्थिरावल्या होत्या. गेला आठवडाभर मच्छीमारी बंद झाली होती. त्यामुळे सुमारे ६० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मच्छीमारांना कामगारांच्या वेतनाचा भुर्दंडही बसला आहे. निर्यात थांबल्याने परकीय चलन मिळण्यावर परिणाम झाला असून, मत्स्योत्पादन घटणार आहे.