मुंबई – हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. यामध्ये गुन्ह्यातील चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
एबीपीशी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
तर एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशामार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनांवर पडदा पडावा यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरोच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, पण या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.