जय भगवान गोयल लिखित `आज के शिवाजी नरेंद्र मोदी` या पुस्तकावर त्वरित बंदी आणून सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रत्नागिरीच्या मराठा मंडळाने केली आहे. यासंदर्भातील निवेदन आज मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
हे पुस्तक त्वरित मागे घेऊन संबंधित लेखकांनी जाहीर लेखी माफी मागावी. तसेच पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, प्रकाशनाचे हक्कदार आणि प्रशासनाशी संबंधितावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी रत्नागिरी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र घोसाळकर, कार्याध्यक्ष केशवराव इंदुलकर, सचिव विलास सावंत, प्रकाश सावंत, उपेंद्र सुर्वे, मराठा मंडळ संचालक व समन्वयक प्रताप सावंतदेसाई , संचालक भाऊ देसाई, क्षत्रिय मराठा मंडळाचे उपाध्यक्ष संतोष तावडे, संचालक संतोष नलावडे, मनोज साळवी, महिला मंडळ अध्यक्षा मंगलाकाकी नलावडे, सदस्य अविनाश सावंत, विलास पाटील, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.