विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी मुंबईतील प्रदेश कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार, नगरसेवकांसह भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही पाचारण करण्यात आलं आहे. अशातच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर आता मुंबई प्रदेशाध्यक्षपदीही नव्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपद सध्या आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आहे. मात्र लोढा यांची प्रदेशाद्याक्ष पदावरून हकालपट्टी होण्याचे देखील संकेत मिळत आहेत. तर भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. मुंबई प्रदेशाद्याक्ष पदाच्या या शर्यतीत आशिष शेलारांसह अतुल भातखळकर, पराग आळवणी यांचीही नावंही चर्चेत आहेत. पेशाने बांधकाम व्यावसायिक असणारे मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक आहेत. मलबार हिल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर ते आमदारपदी निवडून आले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. आशिष शेलारांना मंत्रिपद दिल्यानंतर शेलारांकडील जबाबदारी लोढांकडे सोपवण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्ता स्थापन करता न आल्याने केवळ सहा महिन्यांतच लोढांची मुंबई प्रदेशाद्याक्ष पदावरून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.