मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार पंतप्रधानांची भेट

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली भेटीवर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच भेट आहे. या भेटीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही शिष्टाचार भेट असल्याचं सांगितलंय जातेय. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याबाबत अजुन जाहीर करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलंय त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत. या भेटीत ते आणखी कुणाला भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. उद्धव ठाकरे यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध झुगारत उद्धव ठाकरे यांनी राज्यात सीएए आणि एनआरपी लागू करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. ‘एल्गार’ परिषदेचा तपास एनआयएला देण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. राज्यात एनआरपी लागू करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केलाय. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत ठाकरेंना युतीधर्माची आठवण करून दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here