पावस : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील तीन आंबा बागांना लागलेल्या आगीत सुमारे साडेतीनशे कलमे खाक झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि बागेमधील कामगारांच्या सतर्कतेमुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, काही ठिकाणी जंगल भागात आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. या गावातील बोरभाटले परिसरात आंबा बागायती आणि जंगल भाग असल्याने गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. गेले दोन दिवस जोरदार वारे वाहात होते. त्याचवेळी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि बागेतील कामगारांनी तातडीने मालकांना कळवले आणि बागेकडे धाव घेतली. मोहन घाटकर, श्री. तोडकर, रमेश शिंदे यांच्या आंबा बागेत आग पसरली. सुमारे साडेतीनशे हापूस कलमे आगीत खाक झाली.