देवरुख : कोरोना साथीच्या काळात ग्रामीण, शहरी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरना सुरक्षिततेची साधने व शासनामार्फत विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे. कोरोना या महाभयंकर साथीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अन्य आजारांच्या बाबतीत उपचार मिळणे तितकेच गरजेचे असून ते काम खासगी डॉक्टर करत आहेत. कोरोना साथ आहे म्हणून या काळात अन्य आजारांनी पीडित रुग्णांची संख्या कमी होणार नाही, ही जबाबदारी त्या रुग्णांचे फॅमिली डॉक्टर म्हणून खासगी डॉक्टर पार पाडत आहेत याकडे खंडागळे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. या महाभयंकर कोरोना साथीच्या संकट काळात एखाद्या सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचाही विमा शासनाने काढावा, अशी विनंती सुहास खंडागळे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:50 PM 30-Mar-20