कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंध:काराला प्रकाशाची ताकद दाखवत आपण एकटं नाही आहोत हे दाखवून द्यायचं आहे, असं म्हणत पाठीमागचा जनता कर्फ्यू जसा यशस्वी केला आणि आपण इतर देशांना जसा आदर्श दिला तसं यावेळीही आपण 5 एप्रिलला घराबाहेर दिवा लावून प्रकाशाची ताकद दाखवूया, असं मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, ही मोठी लढाई मी एकटा कसा लढणार, किती दिवस असे घालवायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल, पण आपण एकटे नाही, 130 कोटी देशवासीयांची सामूहिक शक्ती प्रत्येकाच्या सोबत आहे त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही, असं मोदी म्हणाले.