सध्या राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच अडचणीत आले असून त्यांच्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची पाळी येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ २८ नोव्हेंबरला घेताना उद्धव विधानसभा अथवा विधान परिषद असे दोन्ही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना सहा महिन्यात म्हणजे २८ मे पर्यंत या दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे बंधनकारक आहे. मात्र करोना मुळे सर्व राजकीय हालचालींना खीळ बसली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मे पर्यंत या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागेल आणि पुन्हा नव्याने शपथविधी करावा लागेल असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.