रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी काळात दुचाकी बंदी देखील करण्यात आली आहे. मात्र काहीजण खोटी कारणे देत अनावश्यक कामांसाठी दुचाकीवरून फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत. अशा २५ दुचाकी चालकांवर दि. ०३ एप्रिलला वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. काल २५ जणांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या चालकांचे वहातुक परवाने देखील ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कडक कारवाईची फटका अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना बसू शकतो. यामुळे अशी कारवाई टाळण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केले आहे.