रत्नागिरी : मुंबईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हात पुढे केला आहे. लालपरीतून या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी व तेथून पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील विविध विभागातील ८६ चालक – वाहक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी विभागातील सहाजणांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतानाच लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. रायगड विभागातील २०, सातारा विभाग १६, रत्नागिरी ६, सोलापूर विभाग २३ आणि नाशिक विभाग २१, असे एकूण ८६ एस्.टी.चे वाहक आणि चालक मुंबईकडे रवाना झाले आहेत. लवकरच रत्नागिरी विभागातील आणखी १५ जणांची टीम मुंबईकडे रवाना होणार आहे.