मुंबई : इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून तातडीने त्यांचे निकाल जाहीर करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना केली आहे. परंतु, घटक चाचणी तसेच सहामाही निकालाची कागदपत्रे शाळेतच असून दीड महिन्यापासून असलेल्या लॉकडाउनमुळे शाळेत जाणे शिक्षकांना शक्य झालेले नाही. त्यामुळे निकाल कसे जाहीर करायचे, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे पहिली ते आठवीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे, तसेच नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द करत त्यांचे शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस किंवा अन्य ऑनलाइन पद्धतीने तातडीने कळवावा, असे सांगितले आहे. निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांत कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही, तसेच त्यांना पुढील शिक्षणी वर्षांचा अभ्यास उपलब्ध साहित्यांच्या आधारे करणे शक्य होईल, असे परिषदेचे म्हणणे आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही करावी, अशीही सूचना परिषदेने केली आहे.