मुंबई : लॉकडाऊनमध्ये काल मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील तसंच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दारू दुकानांसमोर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. देशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शिथील केलेल्या नियमांमध्ये झोननुसार दारूची दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. जरी केंद्र सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने घाई करू नये, असा सल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. ‘केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे महसूल वाढविण्याचा दृष्टीने अपेक्षित आहे. परंतु, महसूल वाढणार तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. त्यामुळे राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम होईल, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.