नवी दिल्ली : मंगळवारी रात्री ८ वाजता देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत मोहिमेची महत्त्वाची साखळी म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘२० लाख कोटींचे हे आर्थिक पॅकेज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) सुमारे १० टक्के आहे. हे पॅकेज सन २०२०मध्ये देशाच्या विकास यात्रेला, आत्मनिर्भर भारत मोहिमेला नवी गती प्रदान करेल. देशवासींसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या देशातील श्रमिक, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या आणि देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या मध्यमवर्गासाठी, भारताच्या आर्थिक सामर्थ्याला शिखरावर पोहोचविण्यासाठी संकल्प करणाऱ्या भारतीय उद्योगजगतासाठी हे पॅकेज आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आत्मनिर्भरतेला प्रेरित करणारे हे आर्थिक पॅकेज अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांसाठी असेल आणि त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन टप्प्याटप्प्याने जाहीर करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Home देशभरातील घडामोडी आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींकडून २० लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर