राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 ते 25 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 44 लाख 75 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 77 हजार 191 क्विंटल गहू, 15 लाख 18 हजार 925 क्विंटल तांदूळ, तर  21 हजार 98 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 99 हजार 579 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मे पासून एकूण 1 कोटी 3 लाख 71 हजार 825 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 4 कोटी 66 लाख 8 हजार  लोकसंख्येला 23 लाख 30 हजार 400 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि. 24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आता पर्यंत 7 लाख 53 हजार 810 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 51 हजार 798  क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. राज्यात 1 मे ते 25 मे पर्यंत 822 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here