कोरोनामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. करोनाच्या प्रादुर्भावाने उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याचे सांगून राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना स्थगीत केली. तर संबंधित शेतकऱ्यांची कर्जाची शासनाकडून येणे दर्शवावी, असा आदेश काढला आहे. मात्र, मुळात जिल्हा बॅंकांकडे पैसे नाहीत. आरबीआयचे न ऐकणाऱ्या बॅंका राज्य सरकारचे ऐकून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज देतील का? असा सवाल उपस्थित करून शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून 2 लाख रुपये थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याचे जाहीर केले. 19 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, अद्यापही 11 लाख शेतकरी योजनेपासून वंचित आहेत.