रत्नागिरी : मासळी संवर्धनासाठी १ जूनपासून पश्चिम किनाऱ्यावर मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. माशांच्या या प्रजनन कालावधीत अंड्यांवरील मासे पकडले गेल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजांचा नाश होतो. हे टाळण्यासाठी बंदी लागू केली आहे. सध्या किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठ्या नौका किनाऱ्यावर सुरक्षितस्थळी आणून ठेवण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.