चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दोन महिने एस.टी. सेवा बंद होती. २२ मे रोजी ही सेवा सुरु झाली. मात्र, कमी भारमानामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांना तोट्यात काम करावे लागत आहे. चिपळूण आगाराला आठवडाभराच्या कालावधीत केवळ १ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. सद्यस्थितीत आगारातून जिल्ह्यांतर्गत बस सोडल्या जात आहेत. रत्नागिरी, खेड, दापोली गुहागर आदी मार्गवर मोजक्याच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आगारातून आठवडाभरात दहा हजार कि.मी. लालपरी धावली. मात्र त्याबदल्यात फारच अल्प उत्पन्न मिळाले. लॉकडाऊनपूर्वी आगारातून दिवसाला सुमारे १२०० फेऱ्या सोडण्यात येत होत्या. व दिवसाला सरासरी ८ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, सद्यस्थितीत आठवड्याला केवळ १ लाख उत्पन्न मिळाले आहे.