रत्नागिरी : जिल्ह्यात २८८ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र सुरू असून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेंगी, मलेरिया आदी साथी पसरू नयेत यासाठी हिवताप कार्यालय प्रयत्न करते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्रे उभारली असून आपल्या परिसरात गप्पी मासे पैदास केंद्र असल्यास डासांची उत्पत्ती थांबते. तसेच होणारे आजारही होत नसल्याने जिल्ह्यामध्ये २८८ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्रे उभारली आहेत. याचअंतर्गत इकोफ्रेंडली डास निर्मुलन कार्यक्रम जिल्ह्यात सुरू असून या गप्पी मासे पैदास केंद्रावर ग्रामपंचायतीने तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. संतोष यादव यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यवेक्षक सूर्यकांत चौगुले आदी उपस्थित होते.