भारत-नेपाळ सीमेवर नेपाळकडून अंदाधुंद गोळीबार; १ ठार

नवी दिल्ली : सीमावादावरून भारत आणि नेपाळ दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून हा गोळीबार करण्यात आला. ही घटना नारायणपूर आणि लालबन्दी सीमा भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढीमधील पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेहून अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला. यादरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. दरम्यान, दोघांना उपचारासाठी सीतामढीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here