चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन करण्यास राज्य सरकार बांधील असून ते लवकरच केले जाईल. पुनर्वसनासाठी टप्प्याटप्प्याने काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीच्या निविदाही निघाल्या आहेत, अशी माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली. तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला गुरुवार दि. २ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेला व सुमारे ३६ घरे वाहून ५४ कुटुंबांना त्याचा तडाखा बसला. धरणग्रस्तांच्या योग्य पुनर्वसनासाठी शिवसेना व राज्य सरकार बांधील आहे. शिवाय प्राथमिक स्वरूपाची मदत धरणग्रस्तांना देण्यात आली आहे. अद्यापही जी मदत देय असेल ती लवकरच दिली जाईल. शिवाय पुनर्वसनासाठी जे आवश्यक दायित्व आहे ते आम्ही निभावू, असा निर्वाळा त्यांनी दिला. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून घरांच्या बांधणीस प्राधान्य दिले जाणार आहे. कोरोना साथीच्या प्रादर्भावामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. तरी योग्य ते पुनर्वसन केले जाईल, यासाठी आपला पाठपुरावा आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 03-Jul-20