कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) वर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे. आयपीएलच्या मार्गातील आशिया चषक स्पर्धेचा अडथळा दूर झाला आहे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित होण्याची दाट शक्यता आहे. पण, तरीही आयपीएल नक्की खेळवायची कुठे हा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे. भारतातील सध्याच परिस्थिती पाहता येथे आयपीएल खेळवणे अशक्यच आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती ( यूएई) हे दोन पर्याय आहेत. आयपीएलसाठी आता बीसीसीआयनं जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा नुकसान होण्याचा अंदाज अध्यक्ष सौरव गांगुलीनं व्यक्त केला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास त्या काळात आयपीएल खेळवता येईल. तसे झाल्यास ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल केला जाऊ शकतो. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिकेसाठी दाखल होणार होती आणि त्यानंतर वर्ल्ड कप अन् कसोटी व वन डे मालिका असे वेळापत्रक होते. पण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच होणार नसेल, तर आधी जाण्यात काहीच अर्थ नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितले की,”केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगी शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.”
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 14-Jul-20