रत्नागिरी : कोरोना संसर्ग जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोना रुग्णांवरील उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. एका विशिष्ट भीतीपोटी लोक घरातच थांबत आजार अंगावर काढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालये खुली करावीत अशी मागणी जिल्हा व तालुका पर्ससीन संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रत्नागिरी शहर, परिसर आणि तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार करणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशावेळी इतर कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. तसेच डॉक्टर कमी प्रमाणात असल्यामुळे औषधोपचाराला वेळ लागत आहे. साध्या ताप, सर्दी, खोकला या आजाराला प्रत्येक लोक घाबरत आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताणामुळे अनेक व्यक्ती एका विशिष्ट भीतीमुळे हे आजार घरातच अंगावरच काढत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खुली करावीत अशी मागणी पर्ससीन संघटनांनी केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खाजगी रुग्णालयांना योग्य निर्देशान्वये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरीतुन रुग्ण बाहेर नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये ताबडतोब चालू करावीत अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा व तालुका पर्ससीन संघटनेचे पदाधिकारी नूरुद्दीन पटेल, जावेद होडेकर, नासिर वाघू, विजय खेडेकर, हनिफ मालदार आणि मजर मुकादम यांनी दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 07-Aug-20