रत्नागिरी : बिबट्याने मेर्वी परिसरात माणसांवर हल्ले केल्यानंतर पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. मेर्वी खालची म्हादयेवाडी येथील अमोल अनंत मांडवकर यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार मारले. शुक्रवारी दि. 2 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरापासून काही अंतरावर नेहमीप्रमाणे गुरे सोडण्यात आली होती. त्यानंतर ते कुटुंब कापणीच्या व झोडणीच्या कामात दंग होते. सोडलेल्या गुरांपैकी एक बैल घाबरलेल्या अवस्थेत घरी आला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी काहीतरी घडले असावे, असा अंदाज बांधला. सायंकाळी पाचच्या सुमारास अन्य गुरांसोबत गेलेली गायही न आल्याने घरातील लोक गाय शोधायला गेले. त्यावेळी त्यांना एका झाळीमध्ये गाय मेलेल्या अवस्थेत दिसली. याबाबत तातडीने वनविभागाला कळविल्यानंतर त्यांनी त्या भागात पिंजरा बसवला. तसेच येथून जवळच आणखी एक पिंजरा बसवला आहे. बिबट्या अद्याप पिंजरा व कॅमेर्यातही कैद होत नसल्याने वनविभाग हैराण झाले आहे. पावस परिसरात वनविभागाने जनजागृती सुरू केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 05-Oct-20