मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘केवळ आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘आनंदवन’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ व ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी काल विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेनं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो,’ अशी प्रार्थनाही शिवसेनेनं केली आहे. ‘समाजसेवेचा कौटुंबिक वारसा चालविण्याची ऊर्मी आणि जोडीला अनेकविध कामे करण्याची जिद्द, धडपड असूनही डॉ. शीतल आमटे नैराश्याच्या चक्रव्यूहातून स्वतःला बाहेर काढू शकल्या नाहीत. नैराश्यावर मात करण्यासाठी आपण पेंटिंग कलेचा आधार घेत आहोत असे शीतल यांनीच सांगितले होते. मात्र आता अंतिम क्षणी ‘युद्ध आणि शांतता’ अशी कॅप्शन देत आपलेच एक कॅनव्हास पेंटिंग त्यांनी ट्विट केले आणि जीवनाचे रंगच पुसून टाकले. त्यांच्या मनात नेमके कोणते ‘युद्ध’ सुरू होते आणि कोणती ‘शांतता’ त्यांना अपेक्षित होती या प्रश्नांची उत्तरे आता कधीच मिळणार नाहीत,’ असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:48 PM 01-Dec-20