मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की, ‘आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे’, असे ते सांगत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना सहापैकी केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नगापूरचे मतदारसंघदेखील त्यांनी या निवडणुकीत गमावले. या पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो’. तसेच त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना ‘हिंमत असेल तर एकटे लढा’, असे आव्हानही दिले. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. ‘आम्ही सर्वशक्तिमान आहोत, आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चंद्रकांत पाटलांची होती, ती चांगलीच जिरली आहे.’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपचा समाचार घेतला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 05-Dec-20