रत्नागिरी : केंद्र सरकार संवेदनशील असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधायला तयार आहे. त्यामुळे शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी रत्नागिरीत व्यक्त केला. तावडे यांची राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सोमवारी रत्नागिरीत भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्वही कमी होणार नाही. याउलट दलालांकडून शेतकऱ्यांची लूट थांबायला मदत होणार आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल खुल्या बाजारात विकायची संधी उपलब्ध झाली आहे. या खुल्या बाजारांपेक्षा अधिक फायदे बाजार समित्यांनी मिळवून दिले, तर शेतकरी बाजार समित्यांकडे वळू शकतील. त्यासाठी बाजार समित्यांनी प्रयत्न करायला हवेत.लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन योग्यच आहे. हिंसक नसलेले, शांततापूर्ण आंदोलन असेल, तर ते चुकीचे नाही. प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आपले मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे. पण इतर बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. संसदेत कृषीविषयक कायदे मांडले गेले, तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते, हा प्रश्न आहे. त्यावेळी काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करू शकतात ? आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोक सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात ? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्द्यावरून राजकारण केले जात आहे, हे नक्की. सातत्याने शेतकरी काही मागत असेल, तर त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. सरकार जेव्हा संवेदनशील असते, शेतकऱ्यांशी संवाद साधायला तयार असते, तेव्हा तो प्रश्न नक्कीच सुटेल. आंदोलन यशस्वी होईल. मोदी सरकारला विरोध करायला विरोधी पक्षाला संधी मिळत नाही. ती मिळाली की, विरोध सुरू होतो. राजकीय पक्षांनी आपापली भूमिका अवश्य घ्यावी, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 08-Dec-20