महामार्ग रुंदीकरणातील अडलेल्या कामांना गती द्या; ना. उदय सामंत यांचे निर्देश

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणातील लांजा तालुक्यातील १८ प्रलंबित भूसंपादन प्रकरणे लवकर निकाली काढावीत, तसेच ८ प्रकरणी निवाडे देऊन थांबलेले काम सुरू करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. याबाबत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात काम २०१८ पासून रखडल्याबाबत तसेच या महत्त्वाच्या विषयात प्रांत अधिकारी खाडे यांनी बैठकीस उपस्थित न राहिल्याबाबत श्री. सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. लांजा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम महामार्गामुळे नव्याने करावे लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी दिला आहे. पुढील १५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन तेथील जलवाहिनी ८० मिमीऐवजी आता १०० मिमी व्यासाची असेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. याआधी झालेल्या एका बैठकीत जिल्ह्यातील देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी शिमगोत्सवाबाबत चर्चा झाली. रत्नागिरीतील भैरी देवस्थानासह इतर सर्व देवस्थान मंडळांनी शासन आणि प्रशासन यांच्या आवाहनानुसार अगदी मर्यादित स्वरूपात आणि करोनाबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून शिमगोत्सव साजरा करावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here