रत्नागिरी : शेतकऱ्यांना खरीपपूर्व भात आणि हळदीच्या लागवडीचे नियोजन करण्याबाबत गुरुवारी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. गूगल मीटद्वारे हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती मिळावी आणि त्यांचे प्रबोधन व्हावे, या हेतूने हा कार्यक्रम झाला. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत कर्जत येथील भात संशोधन केंद्र, अखिल भारतीय समन्वयित मसाले पिके संशोधन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि रिलायन्स फाउंडेशनच्या माहिती सेवा विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भात संशोधन केंद्राचे विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी विद्यापीठाने संशोधन केलेल्या विविध भाताच्या वाणांची माहिती दिली. खरीपपूर्व भातलागवडीचे नियोजन, भातलागवडीच्या नवीन पद्धती, खत व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन याचे संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून विद्यापीठाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. प्रफुल माळी यांनी हळद लागवडीबद्दल मार्गदर्शन केले. हळदीच्या विविध वाणांची माहिती, खरीपपूर्व लागवडीचे नियोजन, खतव्यवस्थायापन, काढणीपूर्व आणि काढणीपश्चात हळद प्रक्रिया यांची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली. जीवनोन्नती अभियानाचे कार्यक्रम समन्वयक विक्रम सरगर यांनी कृषि सखींनी जास्तीत जास्त माहिती घेऊन ती शेवटच्या शेतकर्यां्पर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. तालुका अभियान अधिकारी अमोल काटकर यांनीही कृषिसखी, पशुसखी, मत्स्यसखी यांना मार्गदर्शन केले. रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शेती, पशुपालन आणि मत्स्यपालनाबद्दल माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या 18004198800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 30-Apr-21