कोकणातील धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांकरीता सीआरझेड परवानगीसाठी नियमानुसार प्रक्रिया गतिमान करावी : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

0

मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सागरी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या गाव संरक्षणासाठी आवश्यक असलेले धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असलेली सीआरझेड परवानगी मिळण्याबाबत शुक्रवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना नियमानुसार मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात यावी, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी सीआरझेड मान्यतेबाबत महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे मिऱ्या बंदराचा एकच प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावर प्राधिकरणाच्या पुढच्या बैठकीत चर्चा करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २१ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २८ प्रस्ताव पत्तन व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रस्तावावरही संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रस्ताव लवकरात लवकर सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. खासदार विनायक राऊत यांच्या विनंतीवरुन या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच आलेल्या तौक्ते वादळामुळे सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी तसेच खाडी किनारी भागाला मोठा फटका बसला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्राचे पाणी घुसून घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सागरी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या गाव संरक्षणासाठी धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी सीआरझेडच्या परवानग्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी खा. राऊत यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:27 AM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here