पुणे : केरळात दाखल झाल्यानंतर सुसाट वेगाने महाराष्ट्राच्या पुणे-अलिबाग- उस्मानाबादपर्यंत मजल मारलेल्या मान्सून एक्स्प्रेसला सोमवारी ब्रेक लागला. सध्या मान्सून मुंबईच्या वेशीजवळ थबकला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, दि. ११ जूनच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तयार झाल्यास मान्सूनच्या प्रवासाला वेग येणार अाहे. नैऋत्य मोसमी वारे ११ ते १३ जूनच्या आसपास मुंबईसह महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेशासह ओडिशा, प. बंगाल, छत्तीसगड, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. केरळातून वेगवान प्रवास करत केवळ तीनच दिवसांत मान्सूनने दि. ६ जून रोजी अलिबाग, पुणे, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली होती. सध्या मान्सूनने महाराष्ट्राचा जवळपास ३५ टक्के भाग व्यापला आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या प्रतीक्षेतील जिल्हे : सध्या राज्यातील मान्सूनची उत्तरीय सीमा अलिबाग-पुणे-उस्मानाबाद- लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग अशी आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली व संपूर्ण विदर्भात अद्याप मान्सून दाखल व्हायचा आहे. त्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून दाखल झालेले जिल्हे : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद हे जिल्हे तसेच अहमदनगर व लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग व्यापला अाहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 09-Jun-21