मुंबई : राज्यात आताच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही फार गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. मात्र, तसे झाले नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झाले आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 28-Jun-21