महावितरणच्या कर्मचाऱ्याने छातीपर्यंतच्या पाण्यात जाऊन केला वीजपुरवठा सुरळीत

0

राजापूर : रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील मोसम या गावात पूर आला होता. मात्र तिथल्या एका खांबावर पुढील गावाचा वीज पुरवठा अवलंबून होता. त्यामुळे छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन तिथल्या रुपेश महाडिक या महावितरणच्या कर्मचाऱ्याने त्या खांबावरचा खटका सुरु केला. आणि पुढची गावे प्रकाशमान केली. वीज पुरवठा थोडा वेळ खंडित झाला तरी आपण बोटे मोडायला सुरूवात करतो. काही ठिकाणी महावितरण कर्मचार्यांना मारहाणही होते. पण त्यांचे काम किती जिकरीचे आहे, याचा अंदाजही आपल्याला येत नाही. राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला आहे. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला होता. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित करुन काम सुरू होते. मात्र सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढले आहे. मात्र तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू करुन पुढची गावे प्रकाशमान केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here