रत्नागिरी : आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्याची अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाने कर्जदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजित केलेली विशेष मोही येथील अल्पबचत सभागृहात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात बिघडलेले अर्थचक्र हळूहळू पूर्ववत होत असून रोजगार, व्यवसाय, नोकरीमध्ये हळूहळू गती देण्यात येत आहे. या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बँकांमार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. आपला आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. स्थानिक पिकांचा विचार करून वेगवेगळे उद्योग उभारणे गरजेचा आहे. या योजनांच्या माध्यमातून त्यांनाही मदत करण्यात येईल. शेतकरी, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनी छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट तयार करुन त्यासाठी लागणारे कर्ज राज्य अथवा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून घेऊन आपला आर्थिक विकास साधावा. बचतगटांनीदेखील उद्योग उभारावेत, त्यांनादेखील बँकामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक केशवकुमार यांनी बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी कृषी, मत्स्य, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अर्थसाह्याबाबतची माहिती तसेच बचतगट, स्वयंरोजगार यासाठी राबविण्यात येणाऱ्या बँकेच्या विविध योजनांची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक एन. डी. पाटील, कुमार प्रमोद सिंग, मनीष त्रिपाठी, कृषी विभागाचे डी. के. जाधव यांनी यावेळी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांना व्यापार कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज आदी कर्जमंजुरीचे पत्र देण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:03 PM 26-Oct-21
