शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 23 नोव्हेंबर अशा 20 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच 21 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यासोबतच शाळांना जर नाताळाच्या सुट्ट्या द्यायच्या असतील तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कमी करुन नियोजन करावं, असा सूचनाही शिक्षण विभागानं दिल्या आहेत. परंतु, दिवाळीच्या सुट्ट्यांवरुन शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्या परिपत्रकानुसार 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचं नमूद आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या कधी आणि कशा द्यायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे. ऐनवेळी म्हणजेच सुट्या जाहीर करण्याच्या एक दिवस आधी परिपत्रक काढल्याने हा गोंधळ वाढला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरु असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं साधारण दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरु आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानं मुंबईतील इयत्ता आठवी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत. मात्र दिवाळी काही दिवसांवर आल्यानं अजूनही दिवाळी सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. अशातच आता सुट्टी जाहीर झाल्यानंतरही सुट्टी नेमकी कधीपासून आणि किती दिवस असा गोंधळ निर्माण झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 27-Oct-21