रत्नागिरी : कोरोना आणि समाजात आलेली मरगळ दूर झटकत आता रत्नागिरी पूर्वपदावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचे निमित्त साधून रत्नागिरी ग्राहक पेठेने आयोजित केलेल्या महिला बचत गट, उद्योगिनींनी साकारलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा महिला पतपेढीच्या अध्यक्षा युगंधरा राजेशिर्के यांनी फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून केले. शहराजवळील जे. के. फाइल्स स्टॉप येथील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन सुरू झाले असून ते पाच दिवस चालणार आहे. याप्रसंगी युगंधरा राजेशिर्के म्हणाल्या की, रत्नागिरी ग्राहक पेठेचे प्रदर्शन म्हणजे महिलांना माहेरचा आनंद देणारेच असते. हे कुटुंब चांगल्या प्रकारे चालले पाहिजे, याकरिता प्राची शिंदे भूमिका बजावत आहेत. कोरोनावर मत करून तुम्ही उभ्या राहिलात, हा विश्वास त्यांनी दाखवून दिला. लोकांनी मरगळ झटकली आहे, त्यामुळे दिवाळी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळेल. प्राची शिंदे म्हणाल्या की, आतापर्यंत या प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला यशस्वी झाल्या आहेत. गेली १५ वर्षे हे प्रदर्शन सुरू आहे. कोरोना काळातही नियम पाळून प्रदर्शन घेतले. कोरोना काळात महिलांना त्रास सहन करावा लागला. परंतु गेल्या वर्षी प्रदर्शनात सहभाग घेतल्यावर त्यांना समाधान मिळाले. त्यामुळे यंदासुद्धा दिवाळीनिमित्त प्रदर्शन भरवले आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी मदत दिली आहे. त्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी होते. यावेळी कोमल तावडे, शिल्पा सुर्वे आणि ऐश्वर्या जठार, स्वरूपा साळवी यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांना प्रोत्साहन दिले. महिला बचत गटासाठी योगदान करणाऱ्या शकुंतला झोरे यांच्यासह सर्व मान्यवरांचा पुष्परोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 28-Oct-21
