टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला चांगली कामगिरी बजावता आली नाही. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर निकालही त्यांच्या बाजूने लागले पाहिजेत. विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये भारताला पाकिस्ताविरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडकडूनही 8 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया यांच्याशी होणार आहे. या तिन्ही सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तर, पाकिस्तानच्या संघालाही स्कॉटलँड आणि नामीबियाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यापैकी एकाही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर, भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. याचबरोबर, न्यूझीलंडने अफगाणिस्तानच्या संघाला कमी फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे. तर, नामिबिया आणि स्कॉटलँडच्या संघाला न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. हे सर्व निकाल भारताच्या बाजूने लागल्यास न्यूझीलंड आणि भारताचे 6 गुण होतील. या दोन्ही संघापैकी ज्यांचा रनरेट चांगला आहे, त्यांना उपांत्य फेरी गाठता येणार आहे. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीच्या ब गटातील गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अफगाणिस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या, नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या आणि स्कॉडलँड सहाव्या क्रमांकावर आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:06 PM 01-Nov-21
