रत्नागिरी : बदलते हवामान आणि पाऊसमान यांचा परिणाम शेतीवर होत आहे. हे चक्र बिघडल्यामुळेच उत्पादन मिळत नाही. त्यामुळे बदलते हवामान, पाऊस आणि पीकपद्धती यांचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची गरज आहे.
पाठ्यपुस्तकांत पाण्याविषयीचे महत्त्व मांडावे आणि जलउपयोग दक्षतेसंदर्भात पदवी अभ्यासक्रम सुरू करावा, अशी सूचना जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी येथील अल्पबचत सभागृहात आयोजित जलपरिषदेत केली. रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीने एक दिवसीय जलपरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि श्री. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते झाले.
श्री. राजेंद्र सिंह म्हणाले की, हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. हवामान बदलामुळे पाऊसमान बदलल्याने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी पाऊस आणि शेतीची सांगड घातली पाहिजे. महाराष्ट्राला जलसाक्षरतेची सर्वाधिक गरज आहे. पाणी भरपूर आहे पण त्यामुळे त्याची किंमत नाही. पंचमहाभूते म्हणजेच भगवंत आहे. कोकण हा भगवंताचा सर्वांत लाडका प्रदेश आहे. येथे सर्वाधिक पाऊस पडतो. येथे भरपूर धरणे झाली. पण पाण्याची दक्षता घेतली जात नाही. राणा यांचे भाषण सुरू असतानाच मंत्री सामंत यांनी कुलगुरूंशी संपर्क सधला. त्यानंतर मंत्री भाषणात म्हणाले की, पुढील वर्षापासून मंुबई विद्यापीठामध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू करू. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फ राज्यभरात जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबवू. जिल्ह्यात पाणी वापर संस्था व जलदूतांची नेमणूक करून वर्षअखेरीपूर्वी राजेंद्रसिंह राणा आणि जलनायक किशोर धारिया यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठात बैठक घेऊ. जलशक्तीसाठी सर्वपक्षीय राजकीय ताकद उभी करू. याकरिता तज्ज्ञ द्यावेत, आमचा विभाग खर्च करेल. उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व समाराोपाचा कार्यक्रम राजेंद्रसिंग यांच्या हस्ते करू. हिरवळचे किशोर धारिया म्हणाले की, जिल्ह्यातील ५४ धरणांतील ५०० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर व व्यवस्थापन याकरिताच शाश्वत एकसूत्री कार्यक्रम राबवूया. कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करू या.
पालकमंत्री अनिल परब म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवण्यासाठी पाणी हवे. त्यामुळे शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करावे, शासन त्यात पूर्ण सहभाग घेऊन ताकद देऊ. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आजच्या जलपरिषदेतून शाश्वत आराखडा बनवा, त्याला शासन म्हणून सर्व ती शक्ती देऊ, अशी ग्वाही दिली. तसेच कोकणातील धरणे उभारणी, पाणी साठवणुकीसाठी आणि योजनांसाठी बळ देऊ, असे सांगितले. व्यासपीठावर यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, माजी आमदार बाळ माने, संजय यादवराव आदी उपस्थित होते. जलनायक आणि हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर धारिया यांनी मंत्री उदय सामंत यांचा शाल, पुष्परोपटे आणि मातीच्या कलात्मक घड्यांची फ्रेम देऊन सत्कार केला. या वेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या आयोजनाचा हेतू सांगितला. पर्यटनमंत्री आदिती तटकरे, केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आमदार निरंजन डावखरे, आदींचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 01-Nov-21