‘जयगड बोट दुर्घटना दहशतवादी कृत्याचा भाग?’

0

◼️ आमदार भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शृंगारतळी : जयगड बंदरातून मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली ‘नावेद २’ ही मच्छीमार बोट बेपत्ता झाल्याची घटना घडून १५ दिवस होऊन गेले असून त्यावरील सहा खलाशांपैकी एकाचाच मृतदेह हाती लागला आहे. मात्र, पाचजण अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिक तपास यंत्रणांना अद्याप या बोटीचा काहीच तपास लागला नाही. याविषयी अनेक मच्छीमाररांसह स्थानिकांमध्ये उलट-सुलट शंका व्यक्त केल्या जात असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आ. भास्कर जाधव यांनी दि.९ नोव्हेंबर रोजी हे पत्र पाठविले आहे. बेपत्ता झालेल्या मासेमारी बोटीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले असून या पत्रात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. या मच्छीमार बोटीवर सहा खलाशी होते. या पैकी केवळ एकच मृतदेह सापडला असून अद्याप पाचजण बेपत्ता आहेत. बोटीवर असणारी भांडी, जाळी, मासे साठवण्याचा मोठा टब याचा काहीच पत्ता नाही. जयगड येथे असलेल्या जिंदल कंपनीत मोठे बॉर्ज व बोटी येत असतात. या पैकी कोणाचीतरी मोठी जोरदार धडक बसून ही बोट अपघात ग्रस्त झाली असावी, अशा शंका येथील स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केल्या आहेत, असेही आमदार जाधव यांनी या पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणामध्ये कोणते तरी मोठे दहशतवादी कृत्य असावे किंवा या बोटीचे अपहरण झाले असावे, अशी ही शंका व्यक्त आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 11-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here